पत्रकारितेला जनसुरक्षा कायद्याचा फटका बसणार नाही, पत्रकार संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२५
विविध १२ पत्रकार संघटनांनी एकत्रित येऊन “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” स्थापन करुन महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकातील तरतुदींवर
घेतलेल्या आक्षेपांची दखल घेत मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेऊन पत्रकार संघटनांशी प्रदिर्घ चर्चा केली या चर्चेत जन सुरक्षा विधेयकातील तरतुदींवर व मसुद्यावर आक्षेप घेत हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे प्रथमदर्शनी समाजाच्या सर्वच स्तरातून मत बनले असल्याचे पत्रकार अभिव्यक्ती मंचच्या वतीने एस. एम. देशमुख, संदीप चव्हाण, दिलीप सपाते, यदु जोशी, विशाल सिंग, पंकज दळवी, इंद्रकुमार जैन, प्रदिप मिस्रा, दिपक भातूसे, श्रीकिसन काळे यांनी लक्षात आणून देत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.
पत्रकारांचे सगळे म्हणणे एकुण घेत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मुळात हा कायदा शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी बनवला जात असून हा हा कायदा कुण्याही व्यक्ती विरोधात नसून तो नक्षली प्रवृत्तींना बळ देणाऱ्या संघटनांच्या विरोधात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले व बंदी घातलेल्या संघटनांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात हा कायदा लागू होणार असल्याने या कायद्यामुळे कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाणारा नसल्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे याआधी हा कायदा छत्तीसगड, तेलंगणा आणि ओरिसा सारख्या राज्यात लागू करण्यात आला आहे. परंतु हा कायदा महाराष्ट्रत अस्तित्वात नसल्याने याचा फायदा घेत नक्षली संघटनांनी आपली मुख्य कार्यालये ही महाराष्ट्रातील नक्षली भागात थाटली आहेत. म्हणून या नक्षली कारवायांना पायबंद घालण्यासाठी जन सुरक्षा विधेयकाच्या कठोर कायद्यांची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायधीशांची समिती गठीत केली जाणार असून त्यांच्या मान्यतेनंतरच या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले तसेच या कायद्याबाबत काही मुद्यांवर जर पत्रकार संघटनांच्या काही सुचना असतील तर त्या लेखी स्वरुपात द्याव्यात पत्रकारांनी दिलेल्या सुचनांचा आम्ही अंतीम मसुदा तयार करतांना नक्कीच विचार करु असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी मा. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.
या बैठकीला मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, मुंबई प्रेस क्लब, विधीमंडळ वार्ताहर संघ, अधिस्विकृती पत्रकार समिती, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, बृहन्मुंबई यूनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, मुंबई हिंदी पत्रकार संघ, नॅशनल यूनियन जर्नालिस्ट ऑफ इंडिया आणि जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.