घरात साठवून ठेवलेल्या कापसाला भाव नसल्याने कुऱ्हाड तांडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१२/२०२४
घरात भरुन ठेवलेल्या कापसाला योग्य वेळी योग्य भाव मिळत नसल्याने पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील एका ५६ वर्षीय शेतकऱ्याने आज सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन मदन तवर वय वर्षे ५६ हे पत्नी, तीन मुले, तीन सुना नातवंडे यांच्यासोबत रहात होते. तीन मुले, तीन सुना नातवंडे व पत्नी असा परिवार असल्याने कोरडवाहू अल्पशा शेतजमीनीवर व मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवत होते.
परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात जेमतेम कापूस पिकाचे उत्पन्न हाती आले होते. यातच में, जून महिन्यापासून शेती मशागत, बि, बियाणे खते, किटकनाशके व अंगमेहनत केल्यामुळे घरातील परिस्थिती नाजूक होती. यातच अधुनमधून वैद्यकीय व दैनंदिन खर्च करत, करत संसाराचा गाडा ओढतांना शेतात पिकविलेला कापूस घरात आणला व कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने कापूस पिक घेण्यासाठी झालेला खर्च व कापूस विकून हातात येणारा पैसा, इतर देणेघेणे याचा बजेट बसत नसल्याने व आपल्या हातात चार पैसे शिल्लक रहातील की नाही या आशेवर गजानन तवर आकडेमोड करत भविष्याची स्वप्ने रंगवत होते.
परंतु दिवसामागून दिवस निघून जात होते तरीही कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने गजानन तवर चिंतेत होता. तसेच घरातील परिस्थिती नाजूक असल्याने त्याने त्याची तीन्ही मुले तीनही सुनांना ऊसतोडणी करण्यासाठी कारखान्यावर पाठवले होते. कारण जून महिन्यापर्यंत लागणारा कौटुंबिक खर्च पुढील वर्षी जून महिन्यात शेती, मशागत, बि, बियाणे याकरिता पैसा कुठून आणायचा हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर होता. व याच विवंचनेतून आज दिनांक १९ डिसेंबर २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी घरात कुणीही नसतांना गजानन तवर याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना माहीत पडताच कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
****************************************************
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु हे फक्त आश्वासनच.
****************************************************
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार करतांना मते मिळवून घेण्यासाठी उमेदवारांनी आम्ही शेतकऱ्यांसाठी असे करु, तसे करु, शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करु, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन दिले होते. मात्र आता नागपुरात सुरु असलेल्या अधिवेशनात आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत नाही.
त्यातच कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून याच निराशेतून आज पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन तवर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणून आतातरी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.