गुमनाम है कोई बदनाम है कोई, पाचोरा तहसील कार्यालय दलालांच्या विळख्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील बरेचसे गरजू लोक जन्म, मृत्यू नोंद, सातबारा, खाते उतारा, फेरफार नोंदी तसेच नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे रेशनकार्ड मधील नावे कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करणे तसेच बारकोड म्हणजे बारा अंकी नंबर मिळवून घेण्यासाठी तसेच संजय गांधी निराधार योजना, जेष्ठ नागरिक, दिव्यांगाच्या समस्या घेऊन पाचोरा तहसील कार्यालयातील संबंधित कार्यालयात येत असतात.
याचाच फायदा घेत तहसील कार्यालयाजवळ टपून बसलेले काही दलाल या लोकांना घेरुन आमची साहेबांशी ओळख आहे, आम्ही तुमचे काम करून देतो असे सांगत संबंधितांकडून नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी दोन हजार, रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी एक हजार, बारकोड मिळवण्यासाठी पाचशे रुपये तसेच जन्म, मृत्यू दाखले, खाते उतारा, फेरफार नोंदी काढून देण्यासाठी गरवंताची परिस्थिती व मानसिकता पाहून पाचशे रुपयांपासून तर पाच हजार रुपयांपर्यंत पैसे उकळत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक तपास केल्यावर तहसील कार्यालयाजवळील काही व्यवसायिक व काही सुज्ञ लोकांकडून याबाबत माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील काही तरुण याठिकाणी चांगल्या वेशभूषेत येऊन थांबतात व याठिकाणी हातात कागद घेऊन फिरणाऱ्यांना तसेच झेरॉक्स दुकानांच्या आसपास उभे राहून कोण, कोण, कश्यासाठी व कोणत्या कामासाठी झेरॉक्स काढत आहेत याबद्दल माहिती मिळवून संबंधितांशी संवाद साधून आपल्या शैलीत संधान साधून तुमचे काम आम्ही करुन देतो असे सांगून वरीलप्रमाणे कामानुसार तसेच गरजेनुसार पैसे घेऊन लुट करत असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
या प्रकाराबाबत पुरवठा विभागाचे कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेतली असता आमच्या कार्यालयाचे बाहेर कोण, काय करतो किंवा करत असेल याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. तसेच जर का तहसील कार्यालयाचे जवळपास गरजूंची फसवणूक करणारे काही ठग कार्यरत असतील तर नक्कीच याची माहिती घेऊन संबंधितांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात येईल तसेच ज्यांना पुरवठा विभाग किंवा तहसील कार्यालयातून काही दाखले, कागदपत्रे किंवा स्वस्त धान्य मिळवण्यासाठी काही अडचणी येत असल्यास संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी स्वताहा येऊन थेट संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
(बारा अंकी नंबर मिळवण्यासाठी सगळ्यात जास्त पैसे मोजावे लागतात अशीही माहिती समोर येत आहे कारण बारा अंकी नंबर असल्याशिवाय धान्य दुकानदार धान्य देत नाहीत.)
परंतु गरजु लोक जेव्हा तहसील कार्यालयात कागदपत्रे घेऊन जातात तेव्हा त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत तसेच या टेबलवरुन त्या टेबलावर फिरवा, फिरव केली जाते तसेच नवीन रेशनकार्ड बनवणे, रेशनकार्ड विभक्त करणे, नाव वाढवणे, नाव कमी करणे, विशेष करुन बारा अंकी कोड मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात गेल्यावर व्यवस्थित माहिती सांगितली जात नाही व पाहिजे ते सहकार्य मिळत नसल्याने या कार्यालयात दोन, दोन महिने खेट्या घालून सुद्धा काम होत नाही. व तीच कागदपत्रे दलाला जवळ दिल्यानंतर तेच काम काही तासांत किंवा काही दिवसातच करुन मिळते हा एक महत्त्वाचा विषय समोर येत असल्याने जनमानसातून येणाऱ्या तक्रारी व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत शंका निर्माण होते हे मात्र तेवढेच खरे.
म्हणून गुमनाम है कोई बदनाम है कोई, पाचोरा तहसील कार्यालय दलालांच्या विळख्यात असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.