पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सावलीच भुत आणि अफवांना ऊत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२३
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत विद्यमान आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल कपबशी या निशाणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व राष्ट्रीय काँग्रेसचे मा. श्री. सचिन सोमवंशी यांच्या महाविकास आघाडीचे वज्रमूठ पॅनल छत्री या निशाणीवर व मा. श्री. अमोल भाऊ शिंदे हे एकेला चलो म्हणत शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून शिट्टी या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत.
आज या निवडणूकीसाठी मतदान होत असून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानले जाते म्हणून या निवडणुकीत तिघही पॅनलच्या पक्षप्रमुखांनी काम, दाम, दंड, भेद वापरून जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. याकरिता तिघही पॅनलकडून काल दुपारपासून मतदारांच्या गाठीभेटी घेत मन वळवण्यासाठी हात जोडून, पाया पडून विनवण्या केल्या जात आहेत. तसेच विविध आश्वासने देत सोबतच रोख रकमेची पाकीटे घरपोच दिली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यामुळे सर्वच मतदारांच्या दारात लक्ष्मी चालून येत असल्याने आलेल्या लक्ष्मीचे सगळेच मतदार हसत हसत स्वागत करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिघही पॅनल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाकीटे जरी वाटली असली तरीही आज सकाळी निवडणुकीत जास्तच चढाओढ निर्माण झाली असल्याचे जाणवू लागल्याने आता दिवसाढवळ्या पाकिटे दिली जात आहेत. यामुळे देणाऱ्यांना जरी काही वाटत नसले तरी घेणाऱ्यांना मात्र *ज वाटत आहे त्यातल्या, त्यात काही मतदार वाहत्या गंगेत हात धुवून घेत असून सगळीकडून पाकिटे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला प्रयत्न साध्य करण्यासाठी ते नक्कीच आडोसा घेऊन बसले असल्याने उमेदवार त्यांची शोधाशोध करण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सगळीकडून पाकिटे देतांना व घेतांना मात्र उमेदवार व मतदार आडोशाला जाऊन देवाणघेवाण करत असतांना आपल्याला कुणी पाहिलं का या भितीमुळे कुणाची सावली जरी दिसली तरी आपल्याला कुणी पाहिलं तर नाही ना अशी शंका निर्माण होत असल्याने व पाकिट घेणारे एकमेकांना भेटून तुला किती मिळाले असे विचारत असल्याने आकडेवारीच्या अफवांना उत आला असून कुणाला काही मिळाले किंवा नाही मिळाले तरी स्वताची इभ्रत दाखवण्यासाठी वाढीव आकडेवारी सांगून समोरच्याला हुल देत पाकिट घेतांना मात्र सावधगिरी बाळगत आहेत. ही परिस्थिती म्हणजे सावलीच भुत आणि अफवांना ऊत अशी आहे.
(निवडणुकीत पैशांची होणारी देवाणघेवाण ही बाब लोकशाहीसाठी घोक्याची घंटा असून पैशांच्या बळावर जर निवडणूका होत असतील तर नक्कीच भविष्यात हा संपूर्ण देश भांडवलदारांच्या हातात जाईल व हजार, पाचशेच्या नोटा घेऊन मतदान करणारांना आयुष्यभर गुलामगिरी करावी लागेल हे मात्र निश्चित)