एस. टी. चा प्रवास करण्याची नाही राहिली हिंमत, मायबाप सरकार गॅस सिलिंडरची कमी करा हो किंमत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०४/२०२३
नुकतेच मायबाप सरकारने महिलांना एस. टी. प्रवास भाड्यात पन्नास टक्के सुट दिली आहे. परंतु ही सुट महिलांना जरी खुष करण्यासाठी करण्यात आली असली तरी आजच्या परिस्थितीत किती महिला दररोज एस. टी. तून प्रवास करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजही ग्रामीण भागातील महिलांचे जीवन म्हणजे चुल, मुलं, आणि रोजंदारीवर कामाला जाणे एवढेच तसेच आज जरी महिलांना समसमान हक्क दिले असले तरी आजही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कायम आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
असे असले तरी सरकारने महिलांना एस. टी. प्रवासात पन्नास टक्के सुट देऊन एकप्रकारे उपवासाच्या दिवशी मिष्ठान्न भोजनाच्या जेवणासाठी आमंत्रित करुन एकप्रकारे चेष्टाच केली आहे. तसेच बऱ्याचश्या कुटुंबाच्या घरात गॅस पोहचला नसल्याने ही कुटुंब आजही चुलीवर स्वयंपाक करतांना दिसून येतात तर दुसरीकडे गॅस सिलिंडर महागल्याने ज्यांच्या घरात आज गॅस कनेक्शन उपलब्ध आहे त्यांना मात्र परिस्थिती बेताची असल्याने अकराशे रुपये खर्च करुन गॅस सिलिंडर घेणे आवाक्याबाहेर झाले असल्याने गृहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चुल पेटवण्यासाठी हातची मजूरी सोडून जंगलात फिरुन सरपणासाठी लाकडे व काड्या जमा करण्यासाठी वन, वन भटकावे लागत आहे. तसेच चुल पेटवण्यासाठी लाकडे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होत आहे. म्हणून मायबाप सरकारने आम्हाला जिवाची मुंबई करण्यासाठी जरी एस. टी. प्रवास भाड्यात पन्नास टक्के सुट दिली असली तरी ते आम्हाला शक्य नसल्याने ही सवलत बंद करुन आम्हाला गॅस सिलिंडर योग्य दरात उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली आहे.