इथे तुझ्या बापाचं थडगं बांधण्याची वेळ आली आणि तू बनायेंगे मंदिर म्हणत नाचत फिरतोय. संतोष पाटील.
दिनांक~०१/०४/२०२३
————————————
धर्म हा कुठलाही असो तो माणसाला माणूस बनवण्याचं काम करतो देशाला एकसंघ करण्याचं काम करतो. देश व देशातील जनतेचे देव धर्माच्या नावाखाली वर्गीकरण करत नाही. जगातील सगळ्याचं धर्मांचे विचार शिकवण ही जवळ जवळ सारखीच आहे. कुठलाच धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. मात्र मित्रहो या भारत देशाला कुठले ग्रहण लागले आहे की देवाधर्माच्या नावाखाली देशातील शांततेला, विकासाला, न्यायव्यवस्थेला, तडा जात आहे हे मात्र निश्चित. म्हणून की या गरीब दुबळ्या शेतकऱ्याच्या, गरीबांच्या, मजुराच्या पोरांना धर्मांध करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,
कुठलाही धार्मिक सण, उत्सव असो त्या सण उत्सवातील धर्म बाजूला ठेवून हे अधर्मी लोक मोठ्या शोभायात्रा काढून आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि धर्मांध झालेली पोरं आपसुकच नेत्याच्या जाळ्यामध्ये गुंतत चालली आहेत. देशासमोर दत्त म्हणून उभे असलेली संकट या राजकीय नेत्यांना दिसत नाहीत. अनेक प्रश्न आहेत. अनेक अडचणी आहेत. समस्या आहेत. त्यावर काम न करता इथला हा सुशिक्षित तरुण कसा भरडला जाईल आणि आपली गुलामी कशी करेल याकडे या नेत्यांचा कल जास्त आहे.
मात्र यांच्या कटकारस्थानाला आमची शेतकऱ्याची पोर बळी पडत आहेत. याहून मोठं दुर्दैव काय असेल, आज रोजी शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे. त्याला कारणीभूत हि नेत्या मागे फिरणारी शेतकऱ्याची पोर आहेत हे सांगायची गरज नाही. छत्रपती शाहू महाराजांनी कुठल्याही धर्माचं मंदिर किंवा प्रार्थना स्थळ उभारलं नाही. तर त्या, त्या समाजातील मुलांसाठी वस्तीगृह शाळा व इतर प्रगतीच्या वाटा शोधून काढल्या.
संत गाडगेबाबा म्हणतात देव दगडात नाही तो माणसात आहे. हे मंदिर केवळ मंदिरातील पुजाराचे पोट भरण्याचं साधन आहे. हे माहीत असूनही आपण मानवतेच्या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार न करता दगडाच्याच देवांचे मंदिर उभारण्यात वेळ घालत आहोत. मित्रहो मी कुठल्याही धर्म पंथाच्या विरोधात नाही. देवधर्माच्या विरोधात नाही मात्र आज रोजी या देशाची समाजाची झालेली बिकट अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहिली जात नाही. कारण रोज शेतकरी आत्महत्या करून मारतो आहे. त्याच्या पिकाला भाव नाही. त्याचं जगणं असाह्य झालं आहे. गळ्यापर्यंत आलेलं कर्ज तो फेडू शकत नाही. मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण, मुलांचं लग्न होत नाही. उधळी लागलेल्या खुंटा सारखा शेतकरी बाप उभा आहे. मात्र अजूनही या शेतकरी बापाचे दुःख त्याच्या कपाळ करंट्या मुलांना कळत नाही.
अरे इथे तुझा बाप झाडाला फाशी घेऊन मारतो आहे त्याचा थडगं बांधण्याची वेळ तुझ्यावर आलेले असतांनाच तू बनायेंगे मंदिर म्हणून नेत्याची राजकीय ताकद दाखवण्यासाठी काढलेल्या रॅलीमध्ये नाचतोय अरे तुला कळतंय का शेतकऱ्याच्या पोरा तू काय करतोय. तुझा बाप फाशी घेतोय आणि तू दोरं आणून देतोय, माझ्या मित्रा देवाचं मंदिर झालं पाहिजे त्यातून समाजाचा प्रबोधन सर्वांचा सारखा विकास झाला पाहिजे. शेतकरी हा हिंदू नाही का ? शेतकऱ्याला स्वतःचा जीव नाही का ? धर्म नाही का ? मग शेतकऱ्यालाच का वाळीत टाकला जातोय ?
या गोष्टीचा विचार कर, आम्ही कधीच कुठल्या धर्मा पंथाच्या विरोधात जात नव्हतो आणि जाणार नाही, मात्र धर्मा पंथाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही सदैव बोलत राहू, माझ्या शेतकऱ्याच्या मुला तुला एक आव्हान करतो देवधर्म, धार्मिक ग्रंथ, पूजा पाठ, धार्मिक शोभायात्रा या सगळ्या गोष्टी तुला पुन्हा करता येतील, मात्र तुझा बाप एकदाचा का झाडावर लटकला ना तर तो तुला कधीच दिसणार नाही हे मात्र विसरू नकोस…
संतोष पाटील.
७६६६४४७११२