केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२०२३
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे उध्दव ठाकरे शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, महिला आघाडी, व्यापारी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी व शिवसैनिक व पाचोरा, भडगाव तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव यांच्या तर्फे दिनांक तीन फेब्रुवारी शुक्रवार रोजी तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत उध्दव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या माननीय ताईसाहेब सौ. वैशालीताई सुर्यवंशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री रमेशचंद्र बाफणा, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून याबाबत पाचोरा तालुक्याचे मा. प्रांताधिकारी साहेब, मा. तहसीलदार साहेब व पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देऊन कळवण्यात आले आहे.
या आंदोलनाचा मुळ उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळावा, सोयाबीन, तुर, सुर्यफुल पिकाला प्रति क्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा, पिक विमा योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, तसेच पाचोरा, भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी, शेतीसाठी दिवसा पूर्ण दाबाने सतत आठ तास विद्युतपुरवठा मिळावा, मागील काळातील विज बिलाची संपूर्ण थकबाकी माफ करावी, पाचोरा, भडगाव तालुक्यात पोकरा योजना लागू करावी, से. बी. च्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारावर केलेली बंदी ताबडतोब उठवण्यात यावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, प्रोत्साहनपर अनुदान पात्र शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, जंगली प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे म्हणून या नुकसानी पोटी नुकसान भरपाई मिळावी, जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी, मुख्यमंत्री सौर योजना व पंतप्रधान कुसूम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजने अंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी अनुदानाची रकम तीन वर्षा ऐवजी दोन वर्षात मिळावी या मागणीसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत, जास्त शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी या एक दिवसीय धरणे आंदोलनात सामील व्हावे असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या मा. ताईसाहेब सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले आहे.